वाहतूक कोंडीने ठाणेकर हैराण

ठाणे : मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेला ठाणे जिल्हा आता वाहतुक कोंडीचे आगार ठरू लागले आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी सुरु असलेली सुरु असलेली रस्ते दुरुस्ती आणि मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाची कामे, रस्त्यामध्ये बंद पडणारी जड-अवजड वाहने, खड्डे आणि वाहतुक बदल यामुळे होणाऱ्या कोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत.

जिल्ह्यात थिठिकाणी सुरु असलेल्या नागरी आणि विकास कामांमुळे नागरिकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचता येत नाही. शाळांच्या बसगाड्या वाहतुक कोंडीत अडकत आहे. इंधन आणि वेळेचा अपव्यय होत असल्याने कोट्यवधी रुपये खर्च करुन घरे घेणाऱ्या ठाणेकरांना आता कर्जत-कसाऱ्यातील नागरिकांना रेल्वे प्रवासाने जितका वेळ लागतो. तितकाच वेळ लागत आहे.
मुंबईच्या तुलनेत थोड्या कमी किमतीमध्ये जिल्ह्यात घरे मिळत असल्याने ठाणे शहरातील घोडबंदर, डोंबिवली, कल्याण, बदलापूर, भिवंडी भागात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. ठाणे जिल्ह्यातून मुंबई नाशिक महामार्ग, जुना आग्रा रोड, मुंब्रा बाह्यवळण, महापे-शीळरोड, घोडबंदर,ठाणे- बेलापूर हे महत्त्वाचे मार्ग जातात. तसेच अंतर्गत मार्गांचे जाळेही मोठे आहे. ठाणे जिल्ह्यात पूर्व द्रुतगती महामार्ग, घोडबंदर आणि जुना आग्रा रोड मार्गावरील भिवंडी भागात मेट्रोची कामे सुरू आहेत. तर मुंबई नाशिक महामार्गावर राज्य रस्ते विकास महामंडळाकडून दुरुस्ती आणि रस्ता रुंदीकरणाची कामे सुरू आहेत. शिळफाटा येथे नाल्यामधील पाण्याचा निचरा होण्याचे मार्ग रोखल्याने पावसाळ्यात शिळफाट्यातील रस्त्यावर पाणी साचत आहे. या सर्व त्रासामुळे ठाणेकर हैराण झाले असून दररोज वाहतुक कोंडीचा जाच ठाणेकरांना सहन करावा लागत आहे.
मुंबईहून रात्री घरी परतणारा नोकरदार पूर्व द्रुतगती महामार्गे कोपरी रेल्वे पूलावरून ठाणे शहरात प्रवेश करतो. परंतू या मार्गावरही कोपरी पूल ते कॅडबरी जंक्शन पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे नोकरदारांना कोपरी ते कॅडबरी जंक्शन असा प्रवास करण्यासाठी किमान पाऊण तास लागतो. हे अंतर कोंडी नसल्यास अवघे १५ मिनिटांचे आहे. त्यातच या मार्गावर मोठे खड्डे पडले आहेत. शहरातील अंतर्गत रस्त्यांची अवस्थाही अत्यंत वाईट झालेली आहे. या रस्त्यांवर देखील वाहतुक कोंडी होत असून नागरिक हैराण झाले आहेत. वाहतुक कोंडीमुळे प्रवाशांचा इंधन खर्च वाढत आहे. वेळेचा देखील अपव्यय होत आहे. ठाणे ते कर्जत-कसारा या मार्गावर प्रवासासाठी प्रवाशांना किमान दीड ते दोन तास लागतात. तर ठाणे ते कासारवडवली हे अंतर गाठण्यासाठी देखील प्रवाशांना किमान दीड ते दोन तास लागत आहे. त्यामुळे ठाण्यात वास्तव्य करून उपयोग काय असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

Leave a Comment

× How can I help you?