आई जाऊन नुकतंच एक वर्ष झालं. या वर्षभरात घरात आवराआवरी न केल्यामुळे बराच पसारा होत गेला. मुळात तो पसारा कधी ‘पसारा’ वाटलाच नाही. कारण त्यात अनेक वस्तू या आईच्या लग्नापासूनच्या म्हणजेच जवळपास बासष्ट – त्रेसष्ट वर्षांपासूनच्या… त्यामुळे त्या वस्तूंविषयी एक आपुलकीचं नातं जडलेलं. मन घट्ट करून नकोश्या वस्तू काढायचं ठरवलं आणि समोर आलं वर्षोनुवर्षे स्वयंपाकघरात मांडणीवर असलेलं मिक्सरचं एक जुनं भांड… आणि आठवला या ‘तिसऱ्या’ भांड्याचा प्रवास..
“मधे मधे लुडबूड नको रे करूस”… लहानपणापासूनच सक्काळी सक्काळी आईच्या आवाजात ऐकलेला `प्रेमळ ओरडा’ आजकाल बायकोच्या तोंडून ऐकवा लागतो. त्याशिवाय `पहिल्या चहा’ची चव घशाखाली उतरतच नाही…
`स्वयंपाकघर’ ते `किचन’ या प्रवासात नेहमी काढता पाय घेत घेता नजर मांडणीत स्थिरावलेल्या मिक्सरच्या `त्या’ तिसऱया भांड्याकडे जातेच. आजवर तीन मिक्सर बदलले… पण प्रत्येक मिक्सरबरोबर आलेलं ते `तिसरं भांडं’ कधीच न वापरण्याची आईपासून सुरू झालेली `प्रथा’ `अगं’ही तितक्याच पारंपरिकपणे कसोशिने पाळतेय…
खरंच, काहीच काम नसतं का त्या `तिसऱ्या भांड्या’ला? निदान मी तरी तसंच पहात आलोय. मग का बरं असावं हे, सतत वापरात येणाऱ्या इतर दोन भांड्यांबरोबर? ते नसलंच तर?
पण मग, लहानपणापासून पहात आलेलो मांडणीतली ती जागा? उगाचच रिकामी वाटत राहिल का?
असंच असतं ना आपल्याही आयुष्यात कुणीतरी? एखादं! उगाच!!
कधीच बोलणं नाही, कधीच भेटणं नाही… तरीही `एखादं’ असं कुणीतरी असतंच ना? मनातली रिकामी जागा भरून व्यापणारं… होय, असावंच लागतं असं कुणीतरी `एखादं’; असूनही नसल्यासारखं, तरीही सतत नजरेसमोर दिसावं लागतं…
मग आपणही असंच असावं का एखाद्याच्या आयुष्यात? नकोच! आपलं स्थान त्यांच्या मनात सतत घरघरत राहिलं पाहिजे, सतत वापरात आलं पाहिजे… धुतलं, स्वच्छ केलं की पुन्हा पुन्हा त्याच्या आयुष्यात फिरणारं…
तरीही `त्या’ तिसऱया भांड्याचं मांडणीतलं स्थान असावं एखादं आढळपण दिल्यासारखं…
जुन्याच्या बदल्यात नवीन मिक्सर घेताना दुकानदारही विचारतोच की, ‘तिन्ही’ भांडी आहेत ना!’
: मनीष चंद्रशेखर वाघ