ज्ञानेश्वरीतील काव्यसौंदर्य

एका ग्रंथाची सप्त शताब्दी वर्ष जयंती साजरी होण्याचा सन्मान माऊलींच्या ‘ज्ञानेश्वरी’ला प्राप्त झाला आहे, यातच ग्रंथाची थोरवी सामावलेली आहे. निमित्त केवळ अर्जुनाचे चित्त भानावर आणण्याचे. त्यासाठी माऊली केवढी विलोभनीय संपत्ती आपल्या हाती देतात. खरोखरच आपल्यासारखे पुण्यवान आपणच.

अर्जुनविषाद योग, सांख्य योग आणि कर्मयोग विषद केल्यानंतर माऊली ‘निष्काम कर्मयोग’ म्हणजेच ‘ब्रह्मार्पणयोग’ विषद करतात. अर्जुनाने स्वतच्या मनातील शंका, भीती, संशय निपटून टाकून युद्धासाठी सज्ज व्हावे असे भगवान सांगतात. हे सांगणं देखील अत्यंत रसाळ आणि भावपूर्ण शब्दांत व्यक्त झालं आहे. खरं तर संपूर्ण ग्रंथ हेच एक काव्यलेणं आहे. ओवीच्या शब्दाशब्दातून हे काव्य स्रवते आहे. कशाला वाखाणावे असा संभ्रम मनी दाटतो.
‘माझा मऱ्हाठाचि बोलु कवतिके।
परि अमृतातेही पैजा जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।’ अशी प्रतिज्ञा घेऊनच ज्ञानेश्वरीतील काव्य माऊलींनी फुलवत ठेवले आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला कर्मप्रवृत्तीपर केलेला उपदेश म्हणजेच गीता. आणि तीवरील ओवीबद्ध टीका म्हणजे ज्ञानेश्वरी. अर्थातच तत्त्वज्ञान हा येथील गाभा असला तरी सहज अभिव्यक्ती होते ती माऊलींच्या रमणीय भाषावैभवात.

सुबक पदबंध, मनोहर प्रतिमा आणि रसोत्कट प्रसंग यांचं अस्तित्व ठायीठायी जाणवत राहतं. गीताकथेच्या रूपाने अमृताची गंगा श्रोत्यांना लाभली आहे.
‘तू प्रेमाचा पुतळा। भक्तीचा जिव्हाळा।’ अशा सुंदर शब्दांतून अर्जुन सामोरा येतो. त्याला वेगवेगळ्या प्रकारे भगवंत सावध करत राहतात. आपले कर्म कसे महत्त्वाचे आहे हे सांगताना सूर्याचा दाखला देतात.
‘आणि उदोअस्ताचेनि प्रमाणे।
जैसे न चालता सूर्याचे चालणे।
तैसे नैष्कर्म्यत्व जाणे। कर्मीचि असता।’
…कधी अर्जुनाशी मित्रत्वाच्या नात्याने संवाद साधतात, कधी अधिकारवाणीने सांगतात, तर कधी मातेच्या ममत्वाने समजावतात. पण सतत कर्तव्याची जाणीव करून देत राहतात.

पुण्याची पहाट, पापाचा अंधकार, अविवेकाची काजळी, संतोषाचा गाभारा, वैराग्याची रवी, पंचेंद्रियांची पंचकुंड … अशा अर्थपूर्ण प्रतिमांमधून अध्यात्माचा वास्तव जीवनाशी अर्थपूर्ण मिलाप घडवून आणल्यामुळे रचना अधिकच आकर्षक बनते. रसिक श्रोते आणि वाचक तल्लीन होतात. योग्याला होणाऱ्या ज्ञानप्राप्तीची प्रक्रिया सुंदर दृष्टांत आणि रूपकातून सिद्ध होत राहते. यज्ञाच्या विधीप्रक्रियेतून ज्ञानप्रक्रिया पूर्ण केली जाते.
स्वत:च्या रचनेबद्दल त्यांना प्रचंड आत्मविश्वास आहे.
‘तैसे सांच आणि मवाळ। मितले आणि रसाळ।
शब्द जैसे कल्लोळ। अमृताचे।’
असे हे मार्दव, माधुर्य, परिमळ, कोमलता… अशा काव्यगुणांनी हे काव्य सिद्ध झाले आहे.

कधी हे काव्य कोट्यवधी चंद्रांच्या तेजाला उतरते, तर कधी श्रोत्यांच्या हृदयी ज्ञानाची दिवाळी उजाडते. ‘अतिंद्रीय परी भोगवीन इंद्रियांकरवी.’ हा त्यांचा ठाम निश्चय आहे. एकूणच रमणीय पदबंध, रसवत् उपमा, संवेदनांचे मूर्तिकरण, प्रतिमाचित्रे, संवेद्य दृष्टांत, कोमल मधुर शब्दयोजना अशा काव्यवैशिष्ट्यांचा प्रत्यय ठायी ठायी येत राहतो.  स्वत: ‘निवृत्तीदास’ असल्याची जाणीव ते कदापि विसरत नाहीत. त्याच वेळी स्वत:सह ते श्रोत्यांनाही संगे घेतात. त्यांच्याशी संवाद साधत निरूपण करतात. यामुळे श्रोते धन्य होतात आणि निरूपण एका वेगळ्याच ऊंचीवर पोहोचते. हीच ती किमया ज्यायोगे शेकडो वर्षांनंतरही अमृतमयी ज्ञानेश्वरीची गोडी न उणावता दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे.

– प्रा. विजया पंडितराव

Leave a Comment