बिन मौसम बारिश का मजा भी कुछ औऱ है
चल पड़ी बूंदों की बात ही कुछ और है
सावन में बारिश तो आम बात है
उसकी याद आते ही बारिश का होना खास बात है
यंदा असाच बिन मौसम बारिश बरसू लागला आहे. बिफोर टाईम आलेल्या पावसामुळे सगळ्यांचीच धावपळ उडालीय. तिकडं मुंबईत गेल्या वर्षीची पुनरावृत्ती होणार नाही, असं छातीठोकपणे सांगणाऱ्या प्रशासकांच्या तोंडाला पहिल्या झटक्यातच त्यानं फेस आणला. सगळे दावे आणि वादे पहिल्याच पाण्यात धुवून गेले. इकडं तोंडाचं पाणी पळेपर्यंत पावसाची वाट पाहायची गेली कित्येक वर्षे सवय लागलेल्या शेतकऱ्यांचे सारे आडाखे आणि मनसुबेही त्यानं धुळीत मिळवले. शेकडो हेक्टरवर आता धूळपेरणी होऊ शकणार नाही. बळीराजाला आता चिखलाशी सामना करावा लागणार.
एरवी जूनचा पहिला-दुसरा आठवडा उलटल्यावर आणि ‘टापुर टुपूर’ झड सुरू झाल्यावर मग कॅप्स, रेनकोट, विंडचिटर्स, छत्र्या यांची खरेदी व्हायची. तसा समस्त पुरुषवर्ग किमान या खरेदीबाबत करंटाच! जरा लेडिज छत्र्या बघा! रंग, डिझाईन, प्रकार सगळेच छत्र्यांआतल्या रूपवतीप्रमाणेच डोळ्याचे पारणे फेडतात! तर यंदा या सगळ्यांचा बाजार अजून भरायचाय.
आम्हा कवी-लेखक वर्गावर मात्र या बिफोर टाईम पावसाचा काहीच परिणाम दिसला नाही किंवा झाला नाही. दरवर्षी कवितेतला, कथांतला, कादंबऱ्यांतला, लोकगीतांमधला, बालकवितांमधला पाऊस असे ठराविक लेख-कविता ‘मागील पानावरून पुढे’ या न्यायाने तयारच असतात! मदतीला जुनी कात्रणं असतातच. लेख-कवितांचे टायटल बदलायचे, पहिला प्यारा, पहिले कडवे बदलायचे की आम्ही दरवर्षी नवीन ‘साहित्य’ प्रकाशित करायला तयार. चातकासारखी पर्जन्याची वाट पाहणं, सुसाट वाऱयाचं वाहणं, वृक्षपर्णांचं सळसळणं, विद्युल्लतेचं नाचणं आणि मग जलबिंदूंचं बसरणं वगैरे सगळंच त्यात असतं.
आणखी एका वर्गावर या बिफोर टाईम पावसाचा काहीच परिणाम झालेला दिसत नाही. तो वर्ग म्हणजे आमची ‘सोमरस गँग’! पाऊस इन टाईम असो वा बिफोर टाईम; आमचे वर्षा सहलीचे प्लॅन्स ठरलेलेच असतात. एखादा शनिवार-रविवार खंडाळ्याला, एखादा वीकएंड माळशेजला, कसाऱयाला की कोकणात नाहीतर आजूबाजूचे धबधबेदेखील चालतात. वर्गणी किती, ‘साहित्य’ किती, ‘चकणा’ कुणी काय आणायचा, गाडी कुणाची हे सगळं व्यवस्थापन शास्त्राच्या काटेकोरपणे होतं.
असाही एक पापभीरू वर्ग आहे त्यालाही पावसाची ओढ असते. त्याच्या अवेळी किंवा उशिरा येण्यानं त्याच्यावर थेट काही परिणाम होत नसतो; पण आपल्या परिघात तो पावसाचं स्वागत करतोच. अवेळी भिजल्यानं डोक्यात कानटोपी घालून, नाकावर बम चोळून तो हळूच टेपरेकॉर्डवर ‘भिगी भिगी रातमे, तुम हम हम तुम’ अशासारखी गाणी ऐकेल. एखाद्या निवांत दुपारी जवळच्याच बगेत सहकुटुंब् वर्षासहल काढून मक्याच्या कणसासारख्या सात्विक गोष्टींचा माफक आस्वाद घेईल. संध्याकाळी खिडकीतून धबाधबा कोसळणाऱया पावसाचा आनंद घेत स्वयंपाकघरातून येणाऱया गरमागरम कांदाभज्यांचा समाचार घेत ब्रह्मानंदी टाळी लावत आणि उद्या वेळेवर मस्टर गाठता येऊ दे म्हणत झोपेच्या स्वाधीन होतो.
एकूण काय तर ‘उस को आना था कि वो मुझ को बुलाता था कहीं, दिनभर बारिश थी उस का रात भर पैग़ाम था’!
: मनीष चंद्रशेखर वाघ