मुंबईतील मुसळधार पावसामुळे पहाटे लोकल सेवा ठप्प झाली होती. त्यामुळे चाकरमान्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. स्टेशनवरील ट्रॅकवर पाणी साचल्याने ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल लोकल सेवा ठप्प झाली होती. दरम्यान हळूहळू लोकल सेवा पूर्वपदावर येत आहे. परिणामी सकाळी नोकरीसाठी निघालेल्या नागरिकांना याचा मनस्ताप सहन करावा लागला. केवळ नोकरदारवर्गालाच नाही तर आमदारांनाही पावसाचा फटका सहन करावा लागत असल्याचं चित्र आहे. याचा फटका आपाआपल्या मतदारसंघातून मुंबईला अधिवेशनाला जाणाऱ्या आठ आमदारांनाही बसला. कुर्लाजवळ पावसामुळे त्यांना अडकून पडावे लागले. हे सर्वजण हावडा मेलने मुंबईला निघाले होते. बुलढाणाचे आमदार संजय गायकवाड, मंत्री अनिल पाटील यांच्यासह विदर्भ आणि मराठवाड्याचे आठ आमदार मुसळधार पावसामुळे एक्स्प्रेसमध्ये अडकून पडले.
कोल्हापूरहून निघालेली महालक्ष्मी एक्सप्रेस मुंबईतील बदलापूर येथे अडकली होती. या रेल्वेतून मंत्री हसन मुश्रीफ प्रवास करत होते. मात्र तातडीने ओळखीच्या व्यक्तीला बोलावून मुश्रीफ विधान भवनाकडे रवाना झाले.
लोकलसेवा विस्कळीत झाल्याने एक्स्प्रेस गाड्या धीम्या गतीने सुरू होत्या. लोकल सेवा सुरळित करण्याच्या प्रयत्नात अनेक एक्स्प्रेस गाड्या थांबवण्यात आल्या होत्या तर काही धीम्या गतीने सुरू होत्या. परिणामी अनेक आमदार ट्रेनमध्ये अडकल्याची माहिती आहे. पावसाचा आमदारांना फटका विदर्भ, अमरावती एक्सप्रेस कुर्ला, घाटकोपरदरम्यान अडकली होती. यामधून आमदार महोदय प्रवास करीत होते. या ट्रेनमधून 10-12 आमदार प्रवास करीत होते. मात्र ट्रेन खोळंबल्याने अमोल मिटकरी, मंत्री अनिल पाटील ट्रेनमध्ये अडकले होते. आमदार सुलभा खोडके, आमदार हरिश पिंपळे देखील रेल्वे धीम्या गतीने असल्याने अडकून पडले. जोगेद्र कवाडे – एकनाथ खडसे यांनादेखील देखील रेल्वे धीम्या गतीने सुरू असल्याचा फटका बसला.