आसाममध्ये एकेकाळी मोठ्या संख्येने आढळणारे ग्रेटर ऍडज्यूटंट स्टॉर्क हे क्रौंच प्रजातीमधील सारस पक्षी मोठ्या प्रमाणात आढळत. परंतु स्थानिक लोकांमध्ये असलेल्या काही अंधश्रद्धा किंवा या पक्ष्यांच्या गचाळ दिसण्यामुळे पर्यावरणात “स्वच्छता दूता”चे काम करणाऱ्या या पक्ष्यांची संख्या हळूहळू कमी होत चालली होती. या पक्ष्यांच्या संवर्धनाचे काम आसामच्या डॉ. पुर्णिमा बर्मन यांनी हाती घेतले आणि बघता बघता अथक प्रयत्नांनी या पक्ष्यांची संख्या वाढू लागली. यासाठी त्यांनी स्थानिक महिलांची ‘हरगिला आर्मी’ ची स्थापना केली. ही आर्मी या पक्ष्यांच्या घरट्यांवर लक्ष ठेवू लागली. ज्या घरट्यात पक्षिणी अंडी देणार, त्या घरट्यांचे संरक्षण करू लागली. एखादी माहेरवाशिण जशी बाळंतपणासाठी माहेरी येते, तशी ही हरगिला आर्मी त्या ‘बाळंत’ पक्षिणीचा सांभाळ करते. तिच्या आवडीचे खाद्य घरट्यापुढे ठेवून तिचे डोहाळे पुरविते. डॉ. पुर्णिमादेवी बर्मन यांच्या या कार्याची दखल घेऊन युनायटेड नेशन्सने 2022 चा ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’ हा पुरस्कार देऊन गौरविले.
डॉ. पुर्णिमादेवी यांना नुकतेच “टाइम” मासिकाने “वुमन ऑफ द इयर ” या पुरस्काराने देखील गौरवण्यात आले आहे.
पूर्णिमा देवी बर्मन या एक भारतीय वन्यजीव शास्त्रज्ञ असून वयाच्या पाचव्या वर्षी त्या आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीच्या परिसरातील त्यांच्या आजी-आजोबांच्या गावी गेल्या होत्या. तिथे त्या काही काळ त्यांच्यासोबत राहिल्या. त्यांची आजी शेती करत असे. ती पूर्णिमा देवी यांना आपल्याबरोबर शेतावर आणि आसपासच्या भागांत नेत असे. तिथल्या भातशेतीत आणि दलदलीच्या जमिनीत वावरताना पूर्णिमा देवी यांना हे हरगिला पक्षी सतत दिसत. आजीकडून त्यांच्याबद्दलच्या विविध गोष्टी समजत. त्यातून पूर्णिमा देवी यांच्या मनात या स्थानिक पक्ष्याविषयी एक विशेष ओलावा तयार झाला. पुढे प्राणिशास्त्रात पदव्युत्तर पदवी प्राप्त केल्यानंतर, बर्मन यांनी हरगील पक्ष्यांवर पीएचडीचा अभ्यास करायला सुरुवात केली.
हे पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे पाहून त्यांनी आपला पीएचडीचा प्रबंध पुढे ढकलला आणि हरगिला ही मोठ्या करकोच्याची प्रजाती जिवंत ठेवण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. त्याचाच भाग म्हणून त्यांनी 2007 मध्ये हरगिला पक्ष्यांच्या संरक्षणासाठी मोहीम सुरू केली. त्यासाठी त्यांनी जिथे पक्षी सर्वाधिक संख्येने होते, त्या आसामच्या कामरूप जिह्यातील गावांवर लक्ष केंद्रित केले. त्या कामरूप जिल्हा परिसरातील गावांमध्ये कार्यरत असलेल्या हरगिला आर्मी या संघटनेच्या संस्थापक आहेत आणि एविफौना रिसर्च अँड कन्झर्व्हेशन डिव्हिजन, आरण्यकच्या वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक आहेत. त्यांना याआधी ग्रीन ऑस्कर पुरस्कारही मिळाला आहे.
वरवर पाहता साधेसोपे वाटले तरी हे काम तसे सोपे नव्हते. त्यातला सगळ्यात मोठा अडथळा होता, स्थानिक लोकांच्या हरगिला पक्ष्याविषयीच्या समजुतींचा. हरगिला पक्षी रोगवाहक असतो, तो दिसणे हा अपशकुन किंवा दुर्दैव सूचित करणारे असते असा आसाममधील लोकांमध्ये समज होता. आसाममध्ये मुळातच हा पक्षी ‘हरगिला’ (म्हणजे ‘हाड गिळणारा’) या नावाने ओळखला जातो. त्यामुळेही त्याच्याबद्दल या समजुती होत्या. या गोष्टी हरगिला पक्ष्याच्या मुळावर उठल्या होत्या. त्या बदलणे आवश्यक होते. त्यासाठी पूर्णिमा देवी यांनी गावातील महिलांना एकत्र आणायचे ठरवले आणि त्यासाठी प्रयत्न केले. खास महिलांचे म्हणून ओळखले जाणारे वेगवेगळे सण, उत्सव यात त्या हजेरी लावत. धार्मिक कार्यक्रमांना जाऊन महिलांना जोडून घेत. पाककृतीच्या स्पर्धा आयोजित करत. त्याशिवाय पथनाट्य, सामुदायिक नृत्य अशा सगळ्या माध्यमांतून त्यांनी या परिसरातील स्त्रियांमध्ये आपला वावर वाढवला. त्यांना हरगिला पक्ष्याचे निसर्गचक्रामधले महत्त्व समजावून सांगितले. त्यांचा विश्वास संपादन केला आणि त्यातून उभी राहिली हरगिला आर्मी. हळूहळू ती वाढत गेली. आज दहा हजारांहून अधिक महिला या मोहिमेशी जोडल्या गेल्या आहेत.
पूर्णिमा यांनी दुसरे पाऊल उचलले ते ‘हरगिला’ पक्ष्यांना त्यांची अंडी उबविण्यासाठी सुरक्षित जागा मिळवून देण्याचे. त्यासाठी बांबूच्या बनात घरटी बांधायला हरगिला आमीर्ने सुरुवात केली गेली. या घरट्यांमध्ये हरगिला पक्ष्यांनी अंडी घालायला सुरुवात केली. त्या घरट्यांमध्ये त्यांची पिल्ले जन्माला यायला लागली. मग हरगिला आर्मीने परिसरातील गावागावांतील लोकांमध्ये जागृती करायला सुरुवात केली. हळूहळू त्यांचीही मदत मिळायला लागली. मग हरगिला पक्षी अंडी घालत त्या परिसरात झाडे लावायला या सगळ्यांनी सुरुवात केली. त्यांनी त्या दलदलीच्या प्रदेशात तब्बल 45 हजार झाडे लावली आहेत. हरगिला पक्ष्यांना चांगला अधिवास मिळावा यासाठी पुढील काळात 60 हजार झाडे लावण्याची त्यांची योजना आहे. याशिवाय हरगिला आर्मी नद्यांच्या काठांवर आणि पाणथळ प्रदेशात स्वच्छता मोहीम आयोजित करते. नद्यांमधील प्रदूषण कमी करण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे. पूर्णिमा यांनी हे काम करायला सुरुवात केल्यानंतर कामरूप जिल्ह्यातील दादरा, पचारिया आणि सिंगिमारी या गावांमध्ये हरगिला पक्ष्यांच्या घरट्यांची संख्या 28 वरून 250 च्या वर गेली आहे. पूर्णिमा यांच्या या हरगिला संवर्धन कार्यक्रमामुळे हा परिसर हा मोठा करकोचा या प्रजातीची जगातील सर्वात मोठी प्रजनन वसाहत ठरली आहे.
: मनीष वाघ