पोलिस हुतात्मा दिन 

आज २१ ऑक्टोबर, आजचा दिवस संपूर्ण देशात पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळला  जातो. अखंड देशासाठी त्यागाची भावना ठेवून कर्तव्यावर असलेले अनेक पोलीस जवान शहीद होतात त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा दिवस पाळण्यात येतो.
२१ ऑक्टोबर १९५९ रोजी पोलीस दलातील १० पोलीस शिपाई लडाख हद्दीत भारत – तिबेट सीमेवर व दोन हजार पाचशे हॉट ग्रीन या सीमेवर निर्जन बर्फाच्छादित प्रदेशात कडाक्याच्या थंडीत गस्त घालत असताना धोकादायक पद्धतीने दबा धरून बसलेल्या चिनी सैनिकांच्या हल्ल्यात शहीद झाले. या दिवसाची आठवण रहावी तसेच देशामध्ये दहशतवादी हल्ल्यात, नक्षलवादी कारवाईत, समाज कंटक व हिंसक कृत्य करणाऱ्यांकडून कर्तव्यावर असताना शहीद झालेल्या जवानांच्या स्मृतीला या दिवशी उजाळा दिला जातो.
२४ तास ऑन ड्युटी असे पोलिसांचे वर्णन केले जाते. कारण जनतेच्या सेवेसाठी ते २४ तास तयार असतात गणेशोत्सव असो की नवरात्र, दसरा असो की दिवाळी, ईद असो की नाताळ देशातील जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी ते कायम तत्पर असतात. जेंव्हा आपण आपल्या कुटुंबासोबत हे सण साजरे करत  असतो, तेंव्हा ते आपल्या सुरक्षेसाठी कुटुंबापासून दूर असतात. त्यांच्यामुळेच आपण सर्व सण, उत्सव आनंदाने साजरे करू शकतो. मोर्चे, आंदोलने, निवडणुका पोलिसांशिवाय पार पडूच शकत नाही. मोर्चे, आंदोलने, निवडणुकीसाठी कायम पोलीस बंदोबस्त तैनात असतो. कोणतीही आपत्ती येऊ मग ती निसर्ग निर्मित असो की मानव निर्मित जनतेच्या रक्षणासाठी सर्वात प्रथम पोलिसच हजर असतात. पोलिस जनतेच्या सुरक्षेसाठी काय करू शकतात हे  मुंबईवर झालेल्या २६ / ११ च्या  पाक पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यात जगाने पाहिले आहे. केवळ पोलिसांच्या धाडसामुळे मुंबईवर हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा डाव त्यांच्यावरच उलटला. प्राणाची बाजी लावून पोलिसांनी मुंबई वाचवली. या हल्ल्यात अनेक पोलीस शहीद झाले. स्वतःच्या प्राणांची आहुती देऊन पोलिसांनी मुंबईकरांचा जीव वाचवला.
१९९२ साली मुंबईत झालेल्या जातीय दंगलीतही पोलिसांचे कार्य अतुलनीय असेच होते. कोरोना सारख्या महामारीत तर पोलिसांचे महत्व आणखी अधोरेखित झाले. देशवासियांना कोरोनाच्या महामारीपासून वाचवण्यासाठी पोलिसांनी जे कार्य केले त्याला तोड नाही. कोरोनाने हजारो पोलिसांचा बळी घेतला तरीही पोलीस आपल्या कर्तव्यापासून तसूभरही हलले नाहीत. पंतप्रधानांनी त्यांना त्यांच्या या कार्यासाठी कोव्हिड योद्धा ही उपाधी दिली होती. पंतप्रधानांनी पोलिसांना दिलेली कोव्हीड योद्धा ही उपाधी सर्वार्थाने योग्य होती.
देशातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आपल्या कुटुंबाची पर्वा न करता बारा  ते अठरा तास प्रसंगी सुट्टी न घेता कर्तव्यावर राहून मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी अनेक पोलीस जवान शहीद होतात.
दहशतवादी, नक्षलवादी यासारख्या देशविघातक शक्तींविरुद्ध  लढताना काहींना वीरमरण येते. अशा शहीद जवानांचे स्मरण करून त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करणे  हे देशातील प्रत्येक नागरिकांचे कर्तव्यच आहे. या दिवशी सरकारच्या वतीने पोलीस हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून शहीद पोलीस जवानांना मानवंदना दिली जाते. हा दिवस देशातील सर्व पोलीस जवान, अधिकारी, कर्मचारी  यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा व पवित्र आहे. पोलिस हुतात्मा दिनानिमित्त शहीद पोलीस जवानांना विनम्र अभिवादन !
श्याम ठाणेदार
दौंड, पुणे
९९२२५४६२९५

Leave a Comment