हर शनिवार एक शेर,
मल्लिनाथी सव्वाशेर
??️
काग़ज़ में दब के मर गए कीड़े किताब के
दीवाना बे-पढ़े-लिखे मशहूर हो गया
–बशीर बद्र
आपण नेहमी म्हणत असतो,की ” खऱ्याची दुनिया नाही “. अगदी तसंच शहाण्या माणसाची पण दुनिया नाही असंही अलिकडे लोक म्हणताना दिसतात. संस्कृत मध्ये एक श्लोक आहे.
विद्वत्त्वं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन ।
स्वदेशे पूज्यते राजा विद्वान् सर्वत्र पूज्यते ॥
राजाची कधीही तुलना होऊ शकत नाही कारण राजा हा आपल्या राज्यात मानसन्मान आणि सत्कारास पात्र असतो.पण जो विद्वान आहे त्याला मात्र सर्वत्र मान प्रतिष्ठा असते. पण अलिकडची परिस्थिती पाहता असे क्वचितच दिसून येते.दिवसेंदिवस राज्यकर्त्यांचे महत्त्व अतोनात वाढताना आढळते. प्रजेकडून मान सन्मान मिळवण्यासाठी त्यांची आपापसात टोकाची अहमहमिका चालू असते. साध्या साध्या उदघाटन कार्यक्रमावरून रंगलेले वाद, कलगीतुरे आपण वर्तमानपत्रातून वाचत असतो.अशा प्राप्त परिस्थितीत विद्वान व विचारवंत दोन पावले स्वतःला मागेच ठेवतात.आज सगळीच व्यासपीठे राजकारण्यांना हवी असतात आणि ती व्यापण्याचा ते कसोशीने प्रयत्नही करत असतात. महर्षी व्यासांसारख्या प्रज्ञावंत , विचारवंत व विद्वानांनी मंचावर विराजमान होणे आवश्यक असताना सुमार बुद्धिची मंडळी जर मंचावर विराजमान होणार असतील तर त्याला ‘व्यासपीठ’ तरी कसे म्हणायचे? आज सुमार ,अक्कलशुन्य लोकांच्या मागून चालण्याची वेळ विद्वानांवर आली आहे. आज राजकारणाच्या सत्तेची सूत्रे पानठेलेवाले,भाजी विक्रेते, टॅक्सी-रिक्षा चालवणारे, पहारेकरी म्हणून काम करणारे, हातभट्टीवाले यांच्या हातात गेली असून शासन दरबारी ही मंडळी मोठमोठी पदे भूषवताना दिसत आहेत. सुशिक्षित, विद्वान आणि विचारवंताना त्यांच्या हाताखाली काम करण्याची वेळ आली आहे. प्रज्ञावंताचा शक्तिपात करून त्यांना असमर्थ केले जात आहे.अर्थात याला आपला समाजच कारणीभूत आहे. विचारवंतापेक्षा वावदुकांस डोक्यावर घेणारा समाज असल्यास हेच होणार.कारण समाजच अशा लोकांना मोठे करण्यात मोठा हातभार लावत असतो . समाजाने ,जनतेने कोणाच्या पाठीशी उभे राहायला हवे हे ठरवण्याची वेळ आज नक्कीच आली आहे. कोणाची निवड करायची सुशिक्षित की अशिक्षित? विद्वान की मूर्ख ? गुन्हेगार की स्वच्छ चारित्र्यवान? समाज जर प्रज्ञावंतांची कर्तबगारी कवडीमोल ठरवत असेल तर अडाणी, अशिक्षित व गुन्हेगार यांचीच सत्ता, चलती व हुकूमत यापुढेही आपल्याला पाहायला मिळणार. मग विचारवंत फक्त पुस्तकात गढून गेलेले असतील ,त्यांचा समाज सुधारणांसाठी , समाजाच्या अभ्युदयासाठी काहीही उपयोग करून घेता येणार नाही. जागतिक स्तरावर गौरवलेल्या आपल्या बुद्धिवंताची पत्रास आपण आपल्या देशात वा राज्यात ठेवणार नसू तर बौध्दिक दिवाळखोरी येणार नाही तर काय?.अशा प्रज्ञावंताना बेदखल करून आपण समाजाला अधोगतीकडे नेत असतो.समाजाची पत त्या समाजात बुद्धिवंत व विचारवंत किती आहेत आणि त्यांची दखल समाज किती घेतो यावर ठरत असते. अन्यथा या धरतीवर वेगळेच कीर्तीवंत जन्माला येतील.
ग्रंथात बुडून मेले
येथे ज्ञानवंत
अडाणी निरक्षर
झाले कीर्तीवंत
अशी म्हणण्याची वेळ आपल्या समाजाने आणून देऊ नये..आपल्या प्रगतीपुस्तकाचा दर्जा आपणच सुधारायला हवा ,नाही का!
©️®️ मोरेश्वर बागडे