सागरी परिसंस्थेत मानवी हस्तक्षेप धोक्याचा

पृथ्वीवर प्रामुख्याने पाच महासागर आहेत, प्रशांत, भारतीय, अटलांटिक, उत्तर ध्रुवीय आणि दक्षिण ध्रुवीय महासागर. पर्यावरण तज्ञांच्या मते, दर मिनिटाला सरासरी एक ट्रक प्लास्टिक कचरा समुद्रात टाकला जात आहे. याशिवाय विविध घातक रसायने आणि सांडपाणी यामुळे समुद्राची अवस्था दयनीय होत आहे. दरवर्षी, अब्जावधी टन प्लास्टिक कचरा महासागरांमध्ये संपतो, जो वितळण्यास सक्षम नसल्यामुळे वर्षानुवर्षे तेथेच राहतो आणि महासागरांचे आरोग्य बिघडवण्यात मोठी भूमिका बजावतो. महासागरांमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा तसेच रसायने आणि इतर दूषित पदार्थ असतात.
दररोज शेकडो हजारो टन विषारी रसायने महासागरांमध्ये प्रवेश करत असल्याने, सागरी जैवविविधतेवर वाईट परिणाम होतो, कारण सागरी वनस्पतींच्या वाढीव्यतिरिक्त, त्यांचा सागरी प्राण्यांवरही अत्यंत घातक परिणाम होतो. महासागरांचे तापमान वाढणे, समुद्राच्या पाण्याचे ज्प् मूल्य कमी होणे, पोषक तत्वांचा पुरवठा आणि ऑक्सिजनची कमतरता, या सर्व गोष्टींचा सागरी परिसंस्थेवरील वाढत्या ताणामुळे मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो.
पर्यावरण शास्त्रज्ञांच्या मते, भारतीय उपखंडात दरवर्षी लाखो टन जड धातू आणि क्षारयुक्त पदार्थ हिंद महासागरात शोषले जातात. या प्लास्टिक, रसायने आणि इतर प्रदूषकांमुळे महासागर हाहाकार माजवत आहेत. सर्व सागरी जीवांच्या आरोग्यावरही त्याचा विपरीत परिणाम होतो. समुद्रात संपणारा प्लास्टिकचा कचरा ते अन्न समजून गिळतात, त्यामुळे अनेक सागरी जीवांना जीव गमवावा लागतो. खरं तर, व्हेल आणि समुद्री कासवांसह अनेक सागरी प्राणी अनेकदा मासेमारीची जाळी आणि इतर प्लास्टिक खातात, जे त्यांच्यासाठी खूप घातक ठरतात.
जगभरातील सुमारे 300 कोटी लोक वापरत असलेल्या प्लॅस्टिकमध्ये असलेले हानिकारक रसायने समुद्रातून मासे आणि इतर सागरी जीवांच्या शरीरात प्रवेश करत असून त्यांच्या आरोग्याला हानी पोहोचवत असल्याचे विविध अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. महाकाय सागरी शिकारी प्राण्यांच्या शरीरातील प्रदूषकांचे वाढते प्रमाण हा गंभीर चिंतेचा विषय बनत आहे. यावरून पर्यावरणातील वाढत्या रसायनांचा परिणाम तर दिसून येतोच, पण आपल्या वातावरणात या रसायनांचे प्रमाण वाढत असल्याचेही स्पष्ट होते.
‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या अहवालानुसार, सर्वाधिक प्लास्टिकचा कचरा उत्तर प्रशांत महासागरामध्ये आहे. या भागात प्लास्टिक प्रदूषण आणि सांडपाण्याचे प्रमाण जास्त आहे. त्याचप्रमाणे युरोपियन पर्यावरण एजन्सीच्या अहवालात भूमध्य समुद्रदेखील अत्यंत प्रदूषित असल्याचे निदर्शनास आले आहे. इथेही प्लॅस्टिक प्रदूषण हा एक मोठा चिंतेचा विषय आहे. बाल्टिक समुद्र आणि काळा समुद्रदेखील युरोपमधील सर्वात प्रदूषित पाण्याच्या स्रोतांपैकी मानले जातात. तथापि, अजूनही काही महासागर स्वच्छ आहेत. ‘द हेल्दी जर्नल’च्या अहवालानुसार, वेडेल समुद्र हा जगातील सर्व समुद्रांमध्ये सर्वात स्वच्छ आहे तर दक्षिण पॅसिफिक महासागरात 297 अब्ज आणि दक्षिण अटलांटिक महासागरात 491 अब्ज प्लास्टिकचे कण आहेत. शास्त्रज्ञ आणि संशोधकांच्या मते, हे दोन समुद्र सध्या इतर सर्व महासागरांपेक्षा चांगल्या स्थितीत आहेत. ‘युनायटेड नेशन्स एन्व्हायर्न्मेंट प्रोग्राम’ने 2017 मध्ये समुद्रातील प्लास्टिक प्रदूषणाच्या हानीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘स्वच्छ समुद्र’ मोहीम सुरू केली गेली. या मोहिमेअंतर्गत सर्व देशांना प्लास्टिकचा वापर कमी करण्याची मागणी केली गेली होती.
जगातील सर्वच सागरी परिसंस्था खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाल्या आहेत. विविध प्रकारची रसायने, तेलवाहू जहाजांमधून गळती होऊन समुद्रात पसरलेले खनिज तेल, शहरी-नागरी वस्त्यांमधील सांडपाणी, कारखान्यांमधील औद्योगिक सांडपाणी, आण्विक ऊर्जानिर्मिती केंद्रांमधून प्रक्रियेदरम्यान निर्माण झालेले सांडपाणी, घातक कचऱयाची वाहतूक, जहाजांच्या वाहतुकीमुळे समुद्रात पसरणाया ध्वनीलहरी आणि त्यामुळे सागरी जीवांसाठी अपायकारक ठरत असलेले ध्वनिप्रदूषण आणि या सगळ्यात अतिशय चिंतेची बाब म्हणजे सागरी जीवसृष्टीला आणि पर्यायाने थेट मानवी आरोग्याला धोकादायक ठरत असलेला प्लास्टिकचा कचरा.. हे सर्व अजैविक घटक सागरी प्रदूषणास कारणीभूत आहेत.
याव्यतिरिक्त एका देशातून दुसऱया देशात माल वाहून नेणाऱया जहाजांच्या बलास्ट वॉटरच्या माध्यमातून आपसूकच प्रवास करत आलेले विविध प्रजातींचे सजीव प्राणी हीदेखील समस्या आहे. जहाज इच्छित बंदरावर पोहोचल्यानंतर तिथे निरीम जल ओतले जाते, तेव्हा त्या स्थानिक परिसंस्थेसाठी सर्वस्वी ‘परकीय’ असलेले हे जीव आपोआपच त्या परिसंस्थेत प्रवेश करतात. तिथे ते आपला जम बसवतात आणि यामुळे अनेकदा ते स्थानिक प्रजातींच्या अस्तित्वाला धोकादायक ठरू शकतात. अशा विविध स्रोतांमधून होणारे सागरी प्रदूषण हे सागरी जीवसृष्टीला आणि पर्यायाने अर्थव्यवस्थेला व शेवटी मानवाच्या अस्तित्वालाच धोकादायक ठरते आहे. ही प्रदूषके किंवा प्लास्टिकचा कचरा आपण व्यक्तिश: थेट समुद्रात टाकत नाही हे खरे असले; तरी अप्रत्यक्षपणे ही सर्व प्रदूषके अंतिमत: समुद्राच्या उदरात पोहोचवण्यास तुमच्या-माझ्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांचा फार मोठा वाटा आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. शेवटी अशा समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रभावी जनजागृती मोहिमा कार्यरत होऊन लोकशिक्षणातून जास्तीत जास्त लोकसहभाग मिळवणे ही काळाची गरज आहे.
मनीष वाघ

Leave a Comment

× How can I help you?