लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघात पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर जिल्ह्यासह समर्थकांमध्ये नाराजीची लाट होती. काही समर्थांनी नैराश्येतून टोकाचे निर्णय देखील घेतले. यानंतर पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर घ्या, असे माजी आमदार सुरेश धस म्हणाले होते. दरम्यान आता पंकजा मुंडे समर्थकांनी केलेल्या मागणीमुळे भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
बीड जिल्ह्यातील मुंडे समर्थकांनी पंकजा मुंडे यांचे तात्काळ राजकीय पुनर्वसन करावे अशी मागणी केली आहे. बीड तालूक्यातील सानपवाडीचे ग्रामस्थ यासाठी आक्रमक झाले आहेत. विधानसभेपूर्वी याबाबतचा निर्णय झाला नाही, तर भाजपला मतदान करणार नाही, असा पवित्राच या ग्रामस्थांनी घेतला.
यासंदर्भात एक बैठक देखील झाली असून या बैठकीत हा ठराव घेण्यात आला. आता यावर भाजप काय निर्णय घेते आणि पंकजा मुंडे यांना कशा पद्धतीने संधी मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. अशा पद्धतीचा निर्णय न झाल्यास भाजपला काही मतदारसंघांमध्ये पंकजा मुंडे यांच्या समर्थकांच्या या पद्धतीच्या रोशाला सामोरे जावे लागणार आहे.
