ठाणे : पर्यावरण जनजागृतीचं काम करणे हे आपल्या स्वत:समोरच एखादा आरसा धरण्यासारखे आहे. कारण पर्यावरणावर भाषणे देणे खूप सोपे आहे. परंतु त्याबाबतची दक्षता आपल्या जीवनात अंगिकराणं खूप अवघड आहे. पर्यावरण दक्षता मंडळाने हे काम गेली पंचवीस वर्षे चांगल्या प्रकारे अंगिकारले आहे. केवळ पर्यावरण जनजागृती न करता त्या कामाला लोकप्रियता मिळवून देण्याचे कामही दक्षता मंडळाने केले आहे, असे प्रतिपादन भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष आणि माजी खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी येथे केले. पर्यावरण दक्षता मंडळाच्या रौप्यमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्त ते बोलत होते.
डॉ. सहस्त्रबुद्धे पुढे म्हणाले, पर्यावरणाचा वसा व्यापक व्हायचा असेल तर चळवळ बनण्याची गरज आहे. पर्यावरणात काम करणाऱया सोसायट्यांना पर्यावरणाचे मानक दिले तर पर्यावरण रक्षणाची एक चळवळ उबी राहील.
या रौप्य वर्षपूर्तीनिमित्ताने पर्यावरण स्नेहमेळ्यामध्ये संस्थेचा 25 वर्षांचा प्रवास उलगडून दाखवणारे प्रदर्शन मांडण्यात आले होते. डॉ. सहस्रबुद्धे यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाचे अध्यक्ष उत्तम जोशी, वझे केळकर महाविद्यालयाचे डॉ. सिध्दीविनायक बर्वे, मुंबई विद्यापीठाचे डॉ. संजय देशमुख, पर्यावरण दक्षता मंडळाचे संस्थापक विद्याधर वालावलकर, एन्विरो व्हिजिलचे अध्यक्ष डॉ. विकास हज़िरनीस यांच्यासह संस्थेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
संस्थेचे काम ठाण्यात सुरू झाले. मात्र आता डोंबिवली, कल्याण, टिटवाळा, मुरबाड या भागांतही संस्था कार्यरत आहे. गेल्या 25 वर्षांच्या कारकिर्दीत संस्थेने अनेक नावीन्यपूर्ण प्रकल्प सुरू केले. पर्यावरण शाळा, भटकंती, पालवी, आपलं पर्यावरण मासिक, आपलं पर्यावरण लघुचित्रपट महोत्सव, निसर्गायन, देवराई, स्वच्छ खाडी अभियान, माझा तलाव, ग्रीन करिअर कोर्सेस, ग्रीन लिव्हिंग कन्सल्टन्सी, ग्रीन शॉपी, ग्रीन लव्हर्स क्लब असे अनेकविध प्रकल्प संस्थेने राबवले. या प्रकल्पांची प्रदर्शनी यावेळी लारण्यात आली होती. रविवारची पावसाळी सकाळ असूनही ठाणेकर पर्यावरणप्रेमींनी यावेळी प्रदर्शनी पाहायला गर्दी केली होती.
