किणीकर – वाळेकर संघर्ष ठरतोय एकनाथ शिंदेंसाठी डोकेदुखी

अंबरनाथ : शहरातील शिवसेनेची कार्यकारिणी अंतर्गत गटबाजी, हेवेदावे आणि लोकसभा निवडणुकीतील कामगिरी या पार्श्वभूमीवर बरखास्त करण्यात आली होती. यानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथमध्ये नवीन कार्यकारणीच्या निवडीसाठी इच्छुक कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेतल्या. मात्र यावेळी शहरातील दोन पैकी एक गट मुलाखतींच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिला. त्यामुळे शहरातील गटबाजी कायम असल्याचं स्पष्ट झालं.

शिवसेनेत मागील 10 ते 15 वर्षांपासून आमदार डॉ. बालाजी किणीकर आणि शहरप्रमुख अरविंद वाळेकर असे दोन गट पडले आहेत. मागील 5 वर्षात तर या दोन गटातील शीतयुद्ध टोकाला गेलं आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण प्रचार यंत्रणा आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आली. इतकंच नव्हे, तर इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेच्या शहर शाखेऐवजी बाजूलाच घेतलेल्या नवीन कार्यालयातून निवडणूक प्रचार करण्यात आला होता. यामुळे ही नाराजी अधिकच वाढली होती.

अंबरनाथ शहरात कल्याण लोकसभेतील सर्वाधिक मोठी आणि सर्वात जास्त विकासकामं करूनही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना अपेक्षित मताधिक्य मिळू शकलं नव्हतं. याचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीतही शहरप्रमुखांचा फोटो आमदार गटाने डावलल्याने पुन्हा एकदा वाद निर्माण झाला होता. त्यामुळे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही नाराजी व्यक्त करत या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार अंबरनाथ शहराची शिवसेनेची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नवीन कार्यकारणीत काम करण्यासाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांच्या स्वतः मुलाखती घेतल्या. मात्र या मुलाखतींच्या कार्यक्रमाला शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्यासह त्यांचा संपूर्ण गट अनुपस्थित राहिला. तर नुकतेच काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले नेते प्रदीप पाटील आणि त्यांचे कार्यकर्तेही या बैठकीला अनुपस्थित राहिले. त्यामुळे फक्त एकाच गटातून संपूर्ण शहराची पदं निवडली जाणार का? आणि पक्षात असलेली ही गटबाजी कमी होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांना विचारलं असता त्यांनी मात्र गटबाजी हा तुम्हीच लावलेला शोध असून पक्षात गटबाजी नसल्याचं सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

विधानसभा निवडणुका जसजश्या जवळ येत आहेत. तसे दावे-प्रतिदावे केले जात आहे. काही ठिकाणी नाराजी नाट्यही पाहायला मिळत आहेत. हीबाब राजकीय पक्षांसाठी मात्र डोकेदुखी ठरत आहे. कल्याण हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजला जातो. त्याचा मुलगा श्रीकांत शिंदे हे या मतदारसंघाचे खासदार आहेत. मात्र याच मतदार संघात आता शिवसेना शिंदे गटात नाराजी नाट्य रंगले आहे. त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर या नाराजीचा फटका बसतो की काय याची चर्चा सुरू झाली आहे.

Leave a Comment

× How can I help you?