मुंबई :  जितेंद्र आव्हाड यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्या विषयी जे वक्तव्य केले होते त्याच्या निषेधार्थ हा हल्ला करण्यात आला. शिवाय यापुढच्या काळात आव्हाड यांनी जपून बोलावे असा इशाराही स्वराज्य संघटनेचे सरचिटणीस धनंजय जाधव यांनी दिला आहे. दरम्यान अशा हल्ल्यांना आपण घाबरत नाही असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आहे. शिवाय याची कोणतीही तक्रार आपण करणार नाही असेही ते म्हणाले.

जितेंद्र आव्हाड हे आज पक्ष कार्यालयात होते. त्यांनी या ठिकाणी पत्रकार परिषद ही घेतली. यात त्यांनी विशाळ गडावर झालेल्या प्रकाराबद्दल आपली प्रतिक्रीया दिली. विशाळ गडावर जे झाले ते संभाजीराजे छत्रपतींच्या आडून झाले. त्यांची ही भूमिका योग्य नव्हती. त्यांनी शाहू महाराजांचा वारसा जपला पाहीजे. जर त्यांनी तो जपला नाही तर त्याला आम्ही विरोध करू. संभाजीराजे छत्रपती हे शाहू महाराजांचे रक्ताचे वंशज आहेत.पण मी विचारांचा वंशज आहे. असे वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. विशाळगडावर जे झाले तो पुर्वनियोजित कट होता असा आरोप त्यांनी केला. एका संभाजीच्या आडून दुसऱ्या संभाजीने विशाळगडावर तांडव केले असा आरोपही त्यांनी केला.

स्वराज संघटनेला आव्हाडांची ही भूमिका पटली नाही. या आधीही आव्हाडांनी संभाजीराजे छत्रपती यांना लक्ष्य केले होते. यामुळे संतप्त झालेल्या स्वराज संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आव्हाडांच्या गाडीवर हल्ला केला. आव्हाड पत्रकार परिषद संपवून ठाण्याच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी रस्त्यात त्यांची वाट पाहत असलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर दगड फेकले. काहींना काठीने हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला. यात आव्हाडांच्या गाडीच्या काचा फुटल्या. पोलिसांनी खाली उतरून कार्यकर्त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी आव्हाडांची गाडी पुढे निघून गेली. या घटनेनंतर या हल्ल्याची जबाबदारी स्वराज संघटनेनं घेतली आहे. संघटनेचे सरचिटणिस धनंजय जाधव यांनी हा हल्ला आपणच केला असल्याचे सांगितले आहे. शिवाय संभाजीराजे छत्रपतींवर बोलणे आव्हाडांनी टाळावे असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Leave a Comment

× How can I help you?