माणूस जन्माला आल्यानंतर, प्रथम मातृभाषेतून बोलायला शिकत असतो. कारण मातृभाषा त्याच्यावर योग्य संस्कार करीत असते. त्यातूनच त्याचे जीवन संपन्न होते. प्रत्येकाला स्वतच्या मातृभाषेचा सार्थ अभिमान असतो. मातृभाषा ही सहज आकलन होणारी असते. बुद्धी विकासाला सहज मानवणारी असते. माणसाला स्वत:च्या मातृभाषेतून जेवढे व्यक्त होता येते, तेवढे त्याला इतर भाषेतून व्यक्त होणे जरा अवघडच असते. ज्या गोष्टी मातृभाषेतून जितक्या लवकर समजतात व शिकता येतात, तितक्याच इतर भाषांमधून समजायला व शिकायला वेळ लागतो. त्यासाठी प्रत्येकाने मातृभाषेतूनच शिक्षण घेणे आवश्यक आहे.
शिक्षणाचे माध्यम हे मातृभाषाच असले पाहिजे. कारण माणूस जेव्हा कोणत्याही गोष्टींचे चिंतन व विचार करतो, तेव्हा तो ते मातृभाषेतूनच करतो.
महाराष्ट्रात प्रामुख्याने मुंबईसारख्या शहरामध्ये रेल्वेतून, बसमधून, टॅक्सीतून अथवा रिक्षातून प्रवास करताना किंवा सार्वजनिक ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी होणाऱया चर्चा आणि वार्तालाप ऐकल्यानंतर असे दिसून येते की, एक मराठी माणूस दुसऱया मराठी माणसाबरोबर मातृभाषेतून संवाद साधण्याऐवजी हिंदी भाषेतून व अधूनमधून इंग्रजी शब्दांचा वापर करून संवाद साधण्याचा प्रयत्न करीत असतो. परंतु, थोड्यावेळाने त्यांना आपण मराठी असल्याचा साक्षात्कार होऊन एकमेकांना ‘सॉरी’ बोलून आपापल्या रस्त्याने निघून जातात. परंतु भारताच्या दक्षिणेकडील राज्यांमधील माणसांना त्यांच्या मातृभाषेविषयी इतका जबरदस्त स्वाभिमान, प्रेम, जिव्हाळा व आपुलकी असते की ते मातृभाषेतूनच संवाद साधत असतात.
थोडक्यात, मराठी माणूस मातृभाषेतून बोलताना हिंदी वा इंग्रजी यांसारख्या भाषेतील शब्दांचा सातत्याने भडीमार करून, मातृभाषेचा कळत-नकळत अनादर करण्याचा प्रयत्न करीत असतो. कारण माणसाला मनाचा दुबळेपणा असल्यामुळे, त्याच्यात परक्या भाषेच्या विचारसरणीत गुलामगिरीचा अंश दिसून येतो. म्हणूनच मातृभाषेला ( मायबोलीला) दूर ठेवून हिंदीला, इंग्रजीला जवळ करतो, म्हणजेच आईचा अपमान करून परक्या बाईचा गौरव करण्यासारखे आहे.
चिपळूणकर हे इंग्रजीला वाघिणीचे दूध म्हणायचे. परंतु आईच्या दुधाची सर वाघिणीच्या दुधाला येणार नाही. म्हणूनच रशियन, पेंच, जर्मन, जपानी, चिनी यांसारख्या परकीय भाषा शिकण्यापेक्षा मातृभाषेला अधिक महत्त्व देवून तिचा प्रचार, प्रसार व विकास करणे आवश्यक आहे. सध्याच्या स्मार्ट फोनच्या जमान्यात मराठी भाषा इतकी इंग्रजाळलेली असून, त्यामधून पाठविण्यात येणाऱया संदेशामध्ये तिचे लचके तोडल्याचे दिसून येते.
म्हणूनच आपल्या देशाचा आणि आपला व्यक्तिगत विकास साधावयाचा असेल, तर माणसांनी मातृभाषेतून संवाध साधून मातृभाषेचे ऋण मानले पाहिजेत व या मातृभाषेतील थोर ठेवा जपला पाहिजे. आपल्या मातृभाषेची थोरवी केवढी मोठी आहे, त्याबाबत कवीवर्य सुरेश भट यांचे काव्य फारच सुप्रसिद्ध आहे, ‘लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी… धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी!’
: संजयकुमार नारायण गोरूले