“ओळखलंस का मला?”

“ओळखलंस का मला?”

अचानक आलेल्या प्रश्नाने
मी मागे वळून पहिलं
कोणीच दिसलं नाही;

वृक्षारोपणाची रोपं घेऊन
मी पुन्हा चालू लागलो

पुन्हा तोच प्रश्न
कोणची दिसेना
अचानक माझं लक्ष
खाली गेलं
तर एक कृश रोपटं
माझ्याशी संवाद साधू पाहात होतं…

“नाही नं ओळखलंस?
अरे मी तेच रोपटं
मागच्या ‘पाच जून’
तू तुझ्या ग्रुपसोबत
अनेक रोपट्यांसह लावलेलं..’.

आठवतंय का मागच्या वर्षीचं
‘पाच जून’चं सेलिब्रेशन?
हातात कुदळ नसतानाही काढलेले
वृक्षारोपणाचे फोटो??
त्याला मिळेलेल्या लाईक्स
आणि कमेंट्स ???
आठवडा उलटून गेला
तरी प्रतिक्रिया मिळताच होत्या तुला..

मला चांगलाच आठवतोय
मागच्या वर्षीचा ‘पाच जून’
तू मला आणि माझ्या साथीदारांना
इथेच याच
फुटपाटच्या कडेला रोवलंत

आमच्या मुळांवर माती टाकलीत,
पाणी घातलंत, खत देखील दिलंत,
त्यामुळे
आम्ही किती
छान हिरवेगार दिसत होतो…

पण आमचं हिरवेपणा
काही दिवसच टिकलं
कारण तुमचं निसर्ग प्रेम
फक्त ‘पाच जून’ पुरतंच होतं …

दुसऱ्या दिवसापासून
तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये व्यस्त झालात
पण आम्हाला विसरलात
आणि आम्ही उन्हात जळत राहिलो.

पुन्हा ‘पाच जून’ उजाडला
आज तू पुन्हा आला आहेस,
अनेक नवीन रोपांसह
नवीन फ्लेक्स, नवीन बोर्ड
“#गो ग्रीन” या नवीन स्टेटससह

तुझं माझ्याकडे लक्ष नव्हतं
पण मला ओरडून सांगायचं होतं
“नवीन झाडे लावा,
पण कधीकधी
जुन्या झाडांचीही काळजी घ्या!”

मी झाड होऊ शकलो नाही,
कारण
तुमची आश्वासने, तुमचे संकल्प
फक्त पर्यावरण दिनापुरतेच होते…

: मनीष वाघ

Leave a Comment