जेव्हा एखाद्या व्यक्तीचे साहसी कारनामे आपल्यासमोर येतात तेव्हा या जगाबद्दल आपल्याला किती कमी माहिती आहे याची जाणीव प्रत्येक क्षणाला होते. अडतीस वर्षापूर्वी, ज्या ब्रोही जमातीत खलिदाचा जन्म झाला, तेथे अनेकदा मुलींचे लग्न त्यांच्या जन्मापूर्वीच ठरलेले असायचे. त्यामागचे मुख्य कारण होते पाकिस्तानातील ‘वट्टा-सट्टा’ विवाहपद्धती. आजही ही प्रथा काही प्रमाणात सुरू आहे. स्त्रियांना पुरुषांची संपत्ती मानण्याच्या या परंपरेत, दोन कुटुंबे एका खुनाच्या गुह्याची भरपाई म्हणून किंवा मालमत्तेशी संबंधित वाद मिटवण्यासाठी मुलींचे लग्न एकमेकांच्या कुटुंबात लावतात. अशा परिस्थितीत मुलींच्या शिक्षणाचा आणि मानवी हक्कांचा विचार कोण करतो? पण खलिद ब्रोहीचे वडील सिकंदर ब्रोही यांच्या धाडसामुळे तीनदा या परंपरेला बळी पडण्यापासून खालिदा वाचली.
पहिल्यांदा, जेव्हा ती जन्माला आली नव्हती, तेव्हा तिच्या काकाने, त्याच्या पत्नीचा खून करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा मुलीच्या बाजूने त्याला एक सट्टेबाजीचा भाग म्हणून मुलगी देण्याची विनंती केली. त्यावेळी कुटुंबात एकही मुलगी नव्हती. म्हणून काकाने आपल्या धाकट्या भावाकडून आणि खलिदाच्या वडिलांकडून वचन मागितले की त्यांची पहिली मुलगी, जी कोणी असेल, ती ‘वट्टा-सट्टा’ साठी देतील. पण खालिदाच्या वडिलांनी ‘मुलीला आपल्या कडेवर घेतल्याशिवाय या प्रथेसाठी देऊ शकत नाही’ असे म्हणत नकार दिला.
सिकंदर ब्रोही 13 वर्षांचे आणि खलीदाची आई केवळ नऊ वर्षांची असताना त्यांचे लग्न झाले होते. खालिदाच्या पालकांनी वेश्याव्यवसायाच्या दडपणाखाली जबरदस्तीने विवाह केला होता. ते दोघेही या दुष्टाईच्या विरोधात होते. त्यामुळेच त्यांना त्यांच्या मुलांनाही अशीच वागणूक मिळावी असे वाटत नव्हते. लग्नानंतर पुढील चार वर्षातच या किशोर जोडप्याला दोन मुले झाली. खालिदाच्या जन्मानंतर दोन वर्षानी, ‘वट्टा-सट्टा’च्या वाढत्या दबावामुळे, पती-पत्नीने गाव सोडून शहरात जाण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून ते आपल्या मुलांना तिथे शिक्षण देऊ शकतील. ते सिंध प्रांतातील हैदराबाद शहरात आले. इथल्या एका झोपडपट्टीमध्ये त्यांना निवारा मिळाला. सुरुवातीला काम मिळणे खूप अवघड होते. पण मिळेल ते काम करून सिकंदर त्यांच्या दोन्ही मुलांना शाळेत पाठवू लागले. सिकंदर ब्रोही यांनी मुलांना गाव आणि आदिवासी संस्कृतीबद्दल सावध केले. हळूहळू कुटुंब वाढत गेले आणि सिकंदर आठ मुला-मुलींचा बाप झाला. नवीन नोकऱया शोधत आणि शहरा-शहरात अनुभव मिळवत, ब्रोही कुटुंब अखेर कराचीच्या झोपडपट्टीत पोहोचले. तिथे राहून खलिदाने योग्य शिक्षण घेतले. केवळ तिच्या गावातीलच नव्हे तर संपूर्ण समाजातील शाळेत जाणारी ती पहिली मुलगी होती.
असे स्वातंत्र्य मिळालेली ती पहिली मुलगी आहे याचा खलिदाला अभिमान होता. पण त्याचवेळी तिला या गोष्टीचंही दुःख होतं की जेव्हा ती शाळेत जात होती, तेव्हा तिच्या अनेक बहिणी आणि कुटुंबातील बालपणीच्या मैत्रिणींची जबरदस्तीने लग्नं लावली गेली. ‘वट्टा-सट्टा’च्या व्यवहारात कांहींची लग्न म्हातऱया माणसांबरोबर लावली तर काही बहिणींचं लहान वयातच मातृत्वाचं ओझं न पेलल्यामुळे निधन झालं. खालिदाला प्रत्येक मृत्यूने दुःख होणे स्वाभाविक होते. पण जेव्हा कधी ‘ऑनर किलिंग’ची बातमी यायची तेव्हा ती हादरायची, कारण खून करणारे भाऊ, काका किंवा मामा असायचे.
ते वर्ष 2002 होते. जेव्हा खालिदा सोळा वर्षांची झाली. एका रात्री तिला कळलं की तिच्याच वयाची एक चुलत बहीण ‘ऑनर किलिंग’ची बळी ठरली आहे. समाजाबाहेरच्या एका तरुणाच्या प्रेमात ती पडली होती. ही ‘गुन्हेगारी’ प्रथा बंद करण्यासाठी जे काही करता येईल ते करेन, असे खालिदा यांनी आपल्या बहिणीच्या मृत्यूनंतर ठरवले. त्याच दिवसापासून तिने ‘ऑनर किलिंग’ विरोधात महिलांना जागृत करण्यास सुरुवात केली.
त्या दिवसांत खालिदाचे कुटुंब कराचीमध्ये एका छोट्या खोलीत राहत होते. आपल्या मुलांचे भविष्य सुधारावे या उद्देशाने वडिलांनी त्या अरुंद खोलीतही संगणकासाठी जागा करून दिली होती. संगणक, इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या मदतीने खलिदा यांनी अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियामध्ये राहणाऱया समविचारी लोकांसह ऑनर किलिंगच्या विरोधात ‘वेक अप’ मोहीम सुरू केली. त्याला भरपूर पाठिंबा मिळाला आणि मुख्य प्रवाहातील माध्यमांनी याला नवी दिशा दिली. ऑनर किलिंगच्या विरोधात कडक कायदे करण्याची मागणी सर्वत्र होत होती. साहजिकच, जातीयवाद्यांनी तसेच कट्टरपंथीयांनी खलिदाला गैर-इस्लामी ठरवून तिच्यावर हल्ले केले.
खालिदाला कराची सोडावी लागली. तिने आपली सर्व कामे बंद केली. सुमारे दोन वर्षांनी ती कराचीला परतली तेव्हा ती खूप निराश झाली होती. आपली मोहीम का अयशस्वी झाल्याचं दुःख तिला होतंच. तिची मोहीम स्थानिक मूल्यांच्या विरोधात जात असल्याचे जाणवले. ती ज्या स्थानिक नायकांसाठी लढत होती त्यांचाही त्यात समावेश नव्हता. मग खालिदाने आपली रणनीती बदलली. ती या समुदायांकडे परत आली, त्यांची माफी मागितली आणि म्हणाली की आम्हाला आमची संस्कृती, भाषा, संगीत आणि भरतकाम जगासमोर न्यायचे आहे. अनेक प्रकारे विनवण्या करून अखेर खलिदाच्या बोलण्यावर समाजाने विश्वास ठेवला.
2008 पासून, खालिदा यांनी ‘सुघड फाउंडेशन’च्या माध्यमातून आदिवासी भरतकामाला चालना देऊन हजारो उपेक्षित महिलांचे जीवन बदलले आहे. याचा अनायसे तिच्या ‘ऑनर किलिंग’ विरोधी अभियानाला उपयोग झाला. ऑनर किलिंगचे गुन्हे पूर्णपणे थांबलेले नसले तरी आदिवासी समाज आणि परिसरात बदलाचे वारे वाहू लागले आहेत. कराचीत जीवाला धोका असल्याने खालिदा अमेरिकेत राहून तिचे अभियान चालवत आहे. तिथल्या तीन शहरांमध्ये आपल्या पतीसोबत बिझनेस सेंटर्स उघडली आहेत. यात पाकिस्तानातील आदिवासी महिलांनी तयार केलेल्या वस्तू विकायाल ठेवते. यातून मिळणारी मिळकत पाकिस्तानातील आदिवासी महिलांच्या उन्नतीसाठी खर्च केली जात आहे.
जर जगातील प्रत्येक जमातीला अशी ‘खलिदा’ मिळाली तर…?
: मनीष वाघ
*‘खलिदा’ प्रत्येक जातीत ‘पैदा’ व्हावी…*
Post Views: 120
Recent Posts
देवांनो ! तुम्ही सुद्धा!…
October 23, 2025
No Comments
पोलिस हुतात्मा दिन
October 21, 2025
No Comments
गोष्ट ॲक्वा लाईन ट्रेनची..
October 21, 2025
No Comments
एकल शिक्षकी शाळा : देशाच्या भविष्यापुढे प्रश्नचिन्ह
October 17, 2025
No Comments
डिएला : अल्बेनियाची पहिली एआय मंत्री
October 15, 2025
No Comments


